पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71000 Appointment Letters वितरण
रोजगार मेळे युवा वर्गाचे सक्षमीकरण करत आहेत आणि त्यांच्या क्षमतांचा सुयोग्य वापर करत आहेत,नवनियुक्तांना माझ्याकडून शुभेच्छा : पंतप्रधान
भारताचा आजचा युवा वर्ग नव्या आत्मविश्वासाने भरलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेः पंतप्रधान
नव्या भारताची उभारणी करण्यासाठी एका आधुनिक शिक्षण प्रणालीची देशाला अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती,राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून देश आता त्या दिशेने आगेकूच करत आहे : पंतप्रधान
आज आमच्या सरकारची ही धोरणे आणि निर्णयांमुळे, ग्रामीण भारतातही रोजगारांच्या आणि स्वयंरोजगारांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, त्यांना त्यांच्या पसंतीचे काम करण्याची एक संधी प्राप्त झाली आहे : पंतप्रधान
महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे : PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.
या मेळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की काल रात्री ते कुवेतहून परत आले, जिथे त्यांनी भारतीय युवा आणि व्यावसायिकांसोबत प्रदीर्घ चर्चा केल्या. तिथून परतल्यावर देशाच्या युवा वर्गासोबत पहिला कार्यक्रम असणे हा एक अतिशय सुखद योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.”देशातल्या हजारो युवांसाठी आज एक नवी सुरुवात होत आहे.तुमची अनेक वर्षांपासूनची स्वप्ने सत्यात उतरली आहेत, अनेक वर्षांच्या कष्टांचे चीज झाले आहे”, पंतप्रधान म्हणाले.
रोजगार मेळ्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या युवा वर्गाच्या गुणवत्तेचा पुरेपूर वापर करण्याला सरकार प्राधान्य देत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या 10 वर्षात विविध मंत्रालये आणि विभागात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय ठामपणे प्रयत्न केले जात आहेत. आज 71,000 पेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.गेल्या दीड वर्षात सुमारे 10 लाख स्थायी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून यामुळे एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित झाला आहे. या नोकऱ्या संपूर्ण पारदर्शकता राखून दिल्या जात आहेत आणि नवे नियुक्त कर्मचारी समर्पित वृत्ती आणि एकात्मतेने देशाची सेवा करत आहेत,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
देशाचा विकास हा तरुणांचे कठोर परिश्रम, युवकांमध्ये असलेली अपार क्षमता आणि त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यासाठी देश वचनबद्ध आहे; आणि यासाठी आपल्या प्रतिभावान तरुणांना सक्षम बनवायचे आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेवूनच देशाची धोरणे निश्चित करताना निर्णय घेण्यात येत आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले की, गेल्या दशकभरात ‘मेक इन इंडिया’ , आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांमध्ये तरुणांना आघाडीवर ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की,भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे.आज भारतीय तरुण नव्या आत्मविश्वासाने भरलेले आहेत. ते प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. आज स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण उद्योजकांना कार्यप्रणालीचा मजबूत पाठिंबा मिळत असल्यामुळे, फायदा होतो. त्याचप्रमाणे, खेळात करिअर करणाऱ्या तरुणांना विश्वास आहे की, ते अपयशी ठरणार नाहीत कारण त्यांना आता आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनत आहे, तसेच विविध क्षेत्रात परिवर्तन घडून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत नवीकरणीय ऊर्जा,सेंद्रिय शेती, अंतराळ, संरक्षण, पर्यटन आणि आरोग्य निरामयता या क्षेत्रातही प्रगती करत आहे. विविध क्षेत्रात नवीन संधी निर्माण करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठत आहे.
देशाच्या प्रगतीसाठी आणि नवीन भारताच्या उभारणीसाठी तरुण प्रतिभेला अधिकाधिक संधी देवून, प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे आणि ही जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) भारताला आधुनिक शिक्षण व्यवस्था प्रदान करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी ही प्रणाली प्रतिबंधात्मक होती; परंतु आता ती अटल टिंकरिंग लॅब आणि पीएम-श्री शाळांसारख्या उपक्रमांद्वारे नाविन्यपूर्णतेला चालना देणारी आहे. “सरकारने मातृभाषेत शिक्षण घेण्याची आणि परीक्षाही देण्याची परवानगी दिली आहे. तसेच यासाठी 13 भाषांमध्ये भरती परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण तरुण आणि उपेक्षित समुदायांसाठी भाषेतील अडथळे दूर केले आहेत. याव्यतिरिक्त, कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्यांसाठी विशेष भरती मेळाव्यासह सीमावर्ती भागातील तरुणांचा कोटा वाढविण्यात आला आहे. आज, 50,000 हून अधिक तरुणांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी नियुक्ती पत्रे मिळाली, ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
चौधरी चरणसिंग जी यांना यावर्षी भारतरत्न देऊन सन्मानित करणे हा सरकारसाठी विशेष क्षण आहे, असे पंतप्रधान चरणसिंग यांच्या जयंतीबद्दल बोलताना म्हणाले. “आपल्याला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा दिवस आपण शेतकरी दिनाच्या रुपात साजरा करतो. भारताची प्रगती ग्रामीण भारताच्या प्रगतीवर अवलंबून आहे, असा चौधरी साहेबांचा असा विश्वास होता. आमच्या सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागात विशेषत: कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत,” असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
गोबर-धन योजनेसारख्या उपक्रमांद्वारे बायोगॅस संयंत्रे उभारली तसेच ऊर्जा निर्मिती करताना रोजगार निर्माण केल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. कृषी बाजारांना जोडणाऱ्या ई-नाम योजनेमुळे रोजगाराचे नवीन मार्ग खुले झाले आहेत आणि इथेनॉल मिश्रणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तसेच साखर क्षेत्रात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. सुमारे 9,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) स्थापनेमुळे बाजारपेठेतील उपलब्धता कशी सुधारली आहे आणि ग्रामीण रोजगार कसा निर्माण झाला आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच, हजारो धान्य साठवणूक गोदामे बांधण्यासाठी सरकार एक मोठी योजना राबवत आहे, त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
सरकारने प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षण देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ड्रोन दीदी, लखपती दीदी आणि बँक सखी योजना यासारख्या उपक्रमांमुळे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातही रोजगार निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले. “आज हजारो महिलांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत आणि त्यांचे यश इतरांना प्रेरणा देत आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा नियम लागू केल्याने लाखो महिलांच्या करिअरचे रक्षण झाले आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानाने महिलांच्या प्रगतीतील अडथळे कसे दूर केले आहेत यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. स्वतंत्र स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना शाळा सोडावी लागत होती, असे ते म्हणाले. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे. तसेच, महिलांसाठी 30 कोटी जनधन खात्यांनी सरकारी योजनांचा थेट लाभ दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. “मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिला आता तारणमुक्त कर्ज मिळवू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेने हे सुनिश्चित केले आहे की वाटप करण्यात आलेली बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत. पोषण अभियान, सुरक्षित मातृत्व अभियान आणि आयुष्मान भारत यांसारखे उपक्रम महिलांना उत्तम आरोग्य सेवा देत आहेत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
नारी शक्ती वंदन अधिनियमाने महिलांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण सुनिश्चित केले आहे. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
आज नियुक्तीपत्रे मिळवणारे तरुण तरुणी नव्या बदललेल्या सरकारी व्यवस्थेत सामील होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात, सरकारी कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमामुळे सरकारी कार्यालयांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नवनियुक्त तरुणांनी हे लक्ष्य गाठले कारण त्यांच्यात शिकण्याची आणि स्वतःचा विकास साधण्याची उत्सुकता आहे. या तरुण तरुणींनी ही वृत्ती आयुष्यभर टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. iGOT कर्मयोगी व्यासपीठावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार या डिजिटल प्रशिक्षण मॉड्यूलचा वापर करण्यास पंतप्रधानांनी प्रोत्साहित केले. “ आज नियुक्तीपत्रे प्राप्त झालेल्या उमेदवारांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो”, असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रोजगार मेळा युवकांना राष्ट्र उभारणी आणि आत्मसशक्तीकरणात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल.
देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित केला जात आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी ही भरती होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, यासह विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये सामील होतील.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले.
X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.”
नोव्हेंबर 2024 मधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक
कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण मजूर (CPI-RL) यांच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर 2024 मध्ये प्रत्येकी 5 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1320 आणि 1331 या पातळीवर पोहोचला.
नोव्हेंबर 2024 या महिन्यात कृषी कामगार आणि ग्रामीण मजूरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 5.35% आणि 5.47% नोंदवले गेले. नोव्हेंबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.37% आणि 7.13% इतका होता. संबंधित आकडेवारी ऑक्टोबर 2024 साठी सीपीआय-एएल साठी 5.96% आणि सीपीआय-आरएल साठी 6.00% अशी होती.


अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सामान्य आणि गट वार):
Group | Agricultural Labourers | Rural Labourers | ||
October, 2024 | November, 2024 | October, 2024 | November, 2024 | |
General Index | 1315 | 1320 | 1326 | 1331 |
Food | 1260 | 1265 | 1267 | 1272 |
Pan, Supari, etc. | 2079 | 2086 | 2088 | 2095 |
Fuel & Light | 1370 | 1375 | 1361 | 1366 |
Clothing, Bedding & Footwear | 1319 | 1326 | 1381 | 1389 |
Miscellaneous | 1368 | 1373 | 1369 | 1374 |


शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुण्यामध्ये तळेगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन- केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.
देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी ही भरती होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, यासह विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये सामील होतील. महाराष्ट्रातही नागपूर आणि पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा , विश्वसनीयता आणि पारदर्शकता ही क्षमता आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दल ग्रुप सेंटर हिंगणा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केले. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. सुमारे 257 जणांना नागपूर मधील रोजगार मेळाव्यात गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. यात सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, रेल्वे, पोस्ट डिपार्टमेंट, बँक या विभागातील उमेदवारांचा समावेश आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2047 सालापर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी देशाच्या युवा वर्गावर आहे आणि आपल्याला एक अतिशय उत्तम संधी पंतप्रधानांनी दिली असून युवा वर्ग या संधीचे नक्कीच सोने करेल, असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये तळेगाव येथे सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ते बोलत होते. आज देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन होत असून 71,000 पेक्षा जास्त नवनियुक्तांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. या मेळाव्यांचा एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोहोळ यांनी गेल्या 10 वर्षात झालेल्या बदलांचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षात जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव मोठे झाले आहे. पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. देशातील निम्म्याहून जास्त लोकसंख्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे, असे मोहोळ म्हणाले. भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश आहे, त्यामुळे पंतप्रधानांची संपूर्ण भिस्त तरुण वर्गावर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या दहा वर्षात 12 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून सुमारे साडेसात लाख रोजगार देण्यात आले, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. देशाच्या विविध सरकारी विभागांमध्ये मिळणाऱ्या या रोजगारांमुळे युवा वर्गाला देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनाही खूप चांगल्या प्रमाणात रोजगार मिळाले असल्याचे या नियुक्तीपत्रांच्या यादीतून आपल्याला दिसत आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. आपला युवा वर्ग म्हणजे देशाची दिशा, देशाची शक्ती आणि देशाचे भविष्य आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये पुरेपूर योगदान द्यावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.


या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभाग/संस्था (बीएसएफ, एसएसबी, आयटीबीपी, सीआरपीएफ, एआर, बीआरओ, इंडियन पोस्ट, एसबीआय, बँक ऑफ इंडिया, , कॅनरा बँक, आयएमयू, सीपीडब्लूडी) मधील सुमारे 500 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. के.के. पांडे, डीआयजी आयआयएम सीआरपीएफ पुणे, जलज सिन्हा, डीआयजी (मेडिकल) सीएच, सीआरपीएफ पुणे आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व नवनियुक्त उमेदवारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दीपक एस पाटील, (AGM) BOM, हरीश उपाध्याय, उपनिबंधक आणि इतर विभाग/संस्थांचे अधिकारी देखील आपापल्या विभाग/संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
एआयएम’ आणि ‘यूएनडीपी’ च्यावतीने ‘युथ को:लॅब 2025’ चे अनावरण; दिव्यांगांच्या समावेशनावर लक्ष केंद्रित करून सामाजिक उद्योजकता वृध्दीसाठी नवोन्मेषकांना केले आमंत्रित
अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी ), सिटी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 2024-2025 साठी ‘Youth Co:Lab National Innovation Challenge’ अर्थात युथ को:लॅब राष्ट्रीय नवोन्मेश आव्हान च्या सातव्या आवृत्तीला अधिकृत प्रारंभ झाला.
या वर्षीच्या आव्हानामध्ये दिव्यांगासह तरुण उद्योजकांना “दिव्यांगांसाठी संधी आणि त्यांचे कल्याण साधणारे नाविन्यपूर्ण पर्याय, उपाय विकसित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सामाजिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आखण्यात आलेला हा उपक्रम AssisTech Foundation (एटीएफ) च्या सहकार्याने राबविला जाणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आता अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तरुण उद्योजकांना आणि दिव्यांग उद्योजकांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. “अपंग व्यक्तींना संधी निर्माण व्हाव्यात, तसेच त्यांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळून, त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी या उपक्रमामध्ये नवनवीन उपाय शोधले जाणार आहेत.’’
वर्ष 2024-2025 साठी सुरू झालेल्या या आवृत्तीतील काम AssisTech Foundation (एटीएफ) च्या सहकार्याने कार्यान्वित केले जाणार असून ही दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञान (AT) नवोन्मेशाला गती देणारी भारतातील आघाडीची संस्था आहे.
युथ को: लॅबची यूएनडीपी आणि सिटी फौंउडेशन द्वारे 2017 मध्ये सह-निर्मिती झाली असून नेतृत्व, सामाजिक नवकल्पना आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तरुणांना सक्षम करणे आणि गुंतवणूक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना,यूएनडीपीच्या भारतातील निवासी प्रतिनिधी डॉ. अँजेला लुसिगी, म्हणाल्या , “आमचा ठाम विश्वास आहे की, तरुण हे फक्त उद्याचे नेते नव्हेत तर आजचे परिवर्तन घडवणारे ते युवक आहेत. प्रथमच, दिव्यांग व्यक्तींव्दारे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेल्या स्टार्टअपला प्राधान्य देण्यात आले आहे. आम्हाला माहित आहे की, दिव्यांगांना सर्वसमावेशक विकासाला चालना देणे हे योग्य तर आहेच त्याचबरोबर शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ते आवश्यकही आहे.”
एटीएफ या वर्षीच्या Youth Co:Lab ची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, दिव्यांगांच्या समावेशात आणि सहाय्यक तंत्रज्ञान नव-उपक्रमांमध्ये त्यांच्या कौशल्याचा फायदा घेतला जात आहे.

आभासी माध्यमातून आयोजित केलेल्या या प्रक्षेपण समारंभात एआयएम, यूएनडीपी- भारत , एटीएफ, सीटी मधील वरिष्ठ अधिकारी तसेच या परिसंस्थेमध्ये कार्यरत असलेल्या100 हून अधिक भागधारकांचा समावेश होता. औपचारिक भागीदारीच्या घोषणेसह कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्यक्ष उपक्रमाच्या प्रारंभाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना पाहण्यासाठी थेट उपलब्ध करून देण्यात आला.
2025 कार्यक्रमाचे उद्दिष्ट सुरुवातीच्या टप्प्यातील 30-35 स्टार्टअपना त्वरित एका वेगवान कार्यक्रमाद्वारे समर्थन देणे आहे, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सना त्यांच्या उपक्रमांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनुदान प्रदान करणे. 18-32 वयोगटातील तरुण संस्थापक, वास्तविक-जगातील आव्हाने सोडविण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या समावेशासाठी अर्थपूर्ण सह-नवकल्पनांना संधी निर्माण करणाऱ्याना अर्ज करण्यास प्रेरित केले जाते.